नवीन कार किंवा बाइक खरेदी करण्याचं स्वप्न बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यानंतर म्हणजे, एक ऑगस्टनंतर तुम्हाला ते स्वप्न साकारता येईल. कारण, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने विमा कंपन्यांना ‘लॉन्ग टर्म इन्शुरन्स पॅकेज’ विकू नये असे आदेश दिले आहेत. यामुळे तीन किंवा पाच वर्षासाठी मोटर वाहन वीमा अनिवार्य करण्याचा नियम बंद करण्यात आला आहे. ग्राहकांना गाडी घेताना याचा थेट परिणाम वाहनांच्या किंमतीवर होणार असून वाहने स्वस्त होतील.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या आदेशामुळे एक ऑगस्टनंतर ग्राहकांना ऑटो इन्शुरन्ससाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार नाहीत. एक ऑगस्टपासून कार आणि टू-व्हिलरच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये बदल होणार आहेत. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA) ने इन्शुरन्स कंपन्यांना जून महिन्यात लॉन्ग टर्म इन्शुरन्स पॅकेज न विकण्याचे आदेश दिले होते. याची सुरुवात एक ऑगस्टपासून होईल.
यापूर्वी 2018 च्या ऑगस्टमध्ये लाँग टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा नियम लागू झाला होता. जून महिन्यात भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA) ने इन्शुरन्स कंपन्यांना हा नवीन आदेश दिला होता. या नियमानुसार नवीन कार खरेदीवर 3 वर्षाची पॉलिसी आणि सप्टेंबर 2018 पासून दुचाकीसाठी 5 वर्षांची इन्शुरन्स पॉलिसी घेणं बंधकारक झालं होतं.
पण आता भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA) ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर वाहनांसाठी लॉन्ग टर्म पॉलिसी बंधनकारक नसेल असे नमूद केले आहे. त्यामुळे आता विमा कंपन्यांना नवीन नियमानुसार 1 वर्ष ऑन रोड डॅमेज पॉलिसी विकता येणार आहे. याचा फायदा ग्राहकांना होणार असून त्यांच्या पैशांची बचत होणार आहे.