तसे आमचे गांव आदिवासी पट्ट्यातलं.
त्र्यंबकेश्वर- ईगतपुरी शेड्युल ट्राईबसाठी राखीव असलेला मतदार संघ.बालपणाचा आणि तारुण्यात येण्याचा बराचसा कालखंड गावाकडे गेला आणि आजही गावाकडची नाळ तितकीच घट्ट आहे,जेव्हडी तेव्हा होती.ठाणे जिल्ह्यातील पालघर,डहाणू,जव्हार,मोखाडा,विक्रमगड हे तालुके आदिवासी बहुल तालुके म्हणून गणले जातात.ठाणे जिल्ह्याचा आवाका एव्हडा मोठा होता की वरील तालुक्यातील लोकांना जिल्ह्याला जायचे म्हणजे कठीणचं. म्हणून पालघर जिल्ह्याची स्वातंत्र्य निर्मिती झाली. आदिवासी बहुल भागातील नागरिकांचा शहरांशी असलेला अत्यल्प संपर्क लोकांना नव-तंत्रज्ञान व जीवनशैली बद्दल अनभिज्ञ ठेवतो.
शहरी संपर्क कमी असल्यामुळे आदिवासी बांधवाना आप-आपले समूह हे सर्वस्व वाटतात तथा जणू आपलं जगचं आहेत अशी त्यांची धारणा झालेली आपल्याला आजही पाहावयास मिळते.
खरं म्हटले तर त्यांची स्वतःची वेगळी अशी ओळख आहे त्यात नृत्य प्रकार, जसे. तारपा नाच,कांबड नाच ई. जिव्या सोमा मशे ह्यांनी देशाला दिलेली देणगी म्हणजेच वारली पेंटींग होय, ह्यासाठी त्यांना 2011 मध्ये सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानीत देखील केले आहे. आदीवासी बहुल भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना ‘जल,जंगल,जमीन ह्याबद्दल अत्यंत जिव्हाळा असतो आणि ह्यातील मोठ्या लोकसंख्या वर्गाचे जीवनमान ह्यावरच अवलंबून असते. जसे, मासेमारी,शिकार,शेती ई..
दळवनवळणाची कमी साधने,शहरांशी असलेली कटुता, शहरी माणूस हा वेगळाच आहे म्हणून त्यांच्याशी नसलेला संवाद,एकंदरीत अशी धारणा आजही आपनांस जाणवू शकते.
मी आठ ते दहा वर्षाचा असतानाचा अनुभव इथे सांगू इच्छितो.(१९९६-९७ दरम्यान)
मे ते जून महिन्याच्या कालावधीत गावाकडे करवंदे (डोंगराची काळी मैना)आवळे (नेहमीचा आवळा नाही) आणि ह्यात महत्वाचं फळ म्हणजे साका (कुणी कुणी शाका असाही उच्चार करतात)
गावठी आंब्याची पिकलेली कैरी.हा रानमेवा (जंगलातील फळे) आणायला आम्ही दोघे किंवा तिघे जण गावापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर जात असू .
मग तिकडे जे भेटेल जसे.करवंदे,आवळा,साका,घरी आणत असू, मग त्यात वाटे करून प्रत्येकाला वाटून घेत असू.असं आमचं प्रत्येक सिजनमधलं महत्वाचं काम. त्या प्रत्येक सिजनमध्ये गावात आणि घरातून एक अफवा पसरलेली असायची (क्वचितच एखादी खरी ठरायची) ति म्हणजे ‘धरोकरी’ (पकडणाऱ्या टोळ्या) सुटलेले आहेत, माणसांच्या किडन्या काढून नेतात,लहान पोरांना पळवून नेतात.त्यात त्यांचे वर्णन सुद्धा असायचे, जसे. साधू लोकं आहेत,गोसावी आहेत,’टक्कल गॅंग आहे,
बाया आहेत त्या लहान पोरांना खाऊ देऊन ‘हुलवून’ घेऊन जातात. अक्षरशः आम्ही साका आणायला जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा कधी जर डांबरी रस्त्याने क्वचितचं येणारी एखादी मोटार आलीच तर जीवाची कालवाकालव होई,जीव मुठीत आवळून एखादया झाड-झुडपांमध्ये आम्ही लपून बसत असू.गाडी गेल्यानंतर जणू काही मानेला लावलेला सुरा कुणीतरी काढून घेतलाय असा मोकळा श्वास आम्ही घेत असू.
दिवसभरात गावातील व्यक्तीच्या माध्यमातून अशीच कुठेतरी बघितलेली गाडी असायची.मग
मारुतीच्या देवळाजवळ ग्रामस्थ एकत्र येऊन होणाऱ्या चर्चेला उधाण आलेले असायचे.त्यातून गावातील तरुण मुले,माणसे ह्यांनी घेतलेला गावाला पहारा देण्याचा निर्णय व्हायचा.त्यानंतर रात्रभर कुर्हाडी,दांडे,पहारी,गलोरी,(बेचक्या) असे सर्व जे जे उपलब्ध शस्त्र आहेत ते सर्व घेऊन लोकं जागरण करीत. जागरण करत असताना काही मुले आट्यापाट्या,
(एक खेळाचा प्रकार) खेळत असे. मुले ह्या उद्देशाने खेळत की,महिला आणि लहान मुले घाबरू नयेत.
काही लोकं गावात येणारे रस्ते दगडांनी आणि ओंडक्यांनी बंद करत असे.
सर्व गावातील भीतीदायक वातावरण तयार झाल्यामुळे प्रत्येक घरात निरव शांतता असायची व एक रात्र म्हणजे एक महिना आहे असचं वाटायचे.मी तर आज्जीजवळून हलत सुद्धा नव्हतो, अगदी लघु शंका असेल तर अज्जिला घेऊन जायचो.
त्या काळात ना फोन होता ना ईंटरनेट,त्यामुळे एकमेकांच्या तांड्यावरची,वाडीवरची,
पाड्यावरची,शिवावरची, गावातली घटना माहीत होने अगदीच मुश्कील होते.त्या बिंबलेल्या अफवांच्या जोरावर,आजही खेड्यात लहान मुलांना घाबरविण्यासाठी “गोसावी येईल तुला धरून नेईल, असे सांगून बाळाला समज देताना आया दिसतात.
हे सर्व लिहण्याचा प्रपंच ह्याचसाठी होता की पालघर जिल्ह्यात,डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावाच्या रस्त्यावर आणि कासा पोलीस स्टेशन हद्दीत जो प्रकार घडला तो अतिशय अमानवी तथा भारतीय सभ्यतेला काळिमा फासणारा आहे.ह्याचा सर्वप्रथम निषेध..!अश्या पद्धधतीचे अफवांचे पीक आजच्या इंटरनेट,मोबाईल-फोन,वाढलेला संपर्क ह्या काळात होणं अपेक्षित नाही.परंतु आजही खेड्यांकडील मानसिकता बदललेल्या वेळेनुसार बदललेली नाही हे अधोरेखित होते.एक गोष्ट खेदाने मांडू इच्छितो की ह्या गुन्ह्यात नाबालीक सुद्धा आहेत.
राजकारणाची किनार देऊन जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ह्याला मॉब लीचिंग (झुंडशाहीचे बळी) असे किंवा ट्रायबल परिसरातील लोकांच्या भीती अन अज्ञानातून गेलेले बळी असे म्हणणे सुद्धा क्रमप्राप्त ठरायला हवं. उपाययोजना म्हणून,सरपंचाने पुढाकार घेऊन ग्रामसभा घेणे,त्यांना विश्वासात घेणे,पोलीस चौक्या वाढवणे,संशयित कसे ओळखावेत ह्याचे प्रशिक्षण देणे किंवा कुणाचा जीव जाणार नाही अशी योजनात्मक तरतूद करून अशा संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देणे असे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
– तुषार देवगांवकर