लखनऊ | लोकमान्य टिळकांनी दिलेला ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,’ या घोषणेने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास बदलण्यासह जुलमी ब्रिटिश राजवटीला उलथून टाकण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये जागवला, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. जगातील सर्वाधिक युवा असलेला देश म्हणून सिद्ध होत असलेल्या भारतातील युवा पिढीला आधुनिक शिक्षण आणि प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच राष्ट्रीयत्वाचे संस्कारही दिले पाहिजेत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
लखनऊ येथे २९ डिसेंबर १९१६ रोजी झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्षस्थानावरून संबोधित करताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी घोषणा केली होती. या घटनेला १०१ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारने लखनौतील लोकभवनात एका विशेष सोहळ्याचे आज आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.