अगदी “साडी घातली म्हणून भारताची नाडी ओळखता येत नाही” म्हणणाऱ्या सिंगलहड्डीपासून ते जर्सी गाय, कॉंग्रेसकी विधवा म्हणणाऱ्या छप्पन इंची गाढवापर्यंत सर्वांनी त्यांच्यावर कुत्सित टीका केली आहे…
पण जिच्या मांडीवर गोळ्यांनी चाळण झालेल्या सासूने जीव सोडला.. जिच्या नवऱ्याच्या शरीराचे अवशेष प्लास्टिकच्या बॅग मध्ये भरावे लागले, ती स्त्री राजकारणात येते.. उत्तरेतल्या परदा संस्कृतीतल्या तथाकथीत मर्दांना आपल्या राजकीय हुशारीच्या जोरावर लगाम घालते, नागपुरातले चड्डीधारक मापात ठेवते, आपल्याला विदेशी म्हणून पक्ष सोडून गेलेल्याना पुन्हा आपल्याच आघाडीत येण्यासाठी तिष्ठत ठेवून, केंद्रात सहाव्या क्रमांकाचं मंत्रिपद देते .. आणि त्यावर कडी म्हणजे अनेकांनी ज्या पदाची सहा दशकं स्वप्न पाहिली ते पंतप्रधानपद नाकारते..
जी बाई लेकरांना घेऊन इटलीला निघून जाणार होती, तिच्या भवती देशाचं राजकारण तिने 2001 पासून फिरवत ठेवलंय याचंच शल्य या देशातील कोत्या मानसिकतेच्या लोकांना आहे.. त्यात भाजप संघावाले आहेत तसंच स्वतःला पुरोगामी समजणारे सरंजामी देखील आहेत, राजकारणातली पहिली मध्यवर्ती महिला म्हणून इंदिराजींचं स्थान अढळ असलं तरी त्या नेहरूंची मुलगी होत्या.. त्यांच्यामागे एका हिमालयाची सावली होती.. याउलट जीव सोडला त्या क्षणाला राजीव पीएम सुद्धा नव्हते, उलट बिनबुडाच्या आरोपांच्या भोवऱ्यात त्यांचं करिअर होतं.
पीएम पदावर असलेल्या इंदिरा गांधीना (विधवेचं तोंड पहायला लागू नये म्हणून) भेट नाकारणाऱ्या शंकराचार्यांचा आपला देश… त्या परंपरेच्या लोकांना ही दुसरी विधवा आपल्याला हार पत्करायला लावते हे सहन होऊच शकत नाही… सोनियाजींवर आज जी पातळी सोडून टीका होते त्यात भीती आणि तिरस्कार या दोन्ही गोष्टींचे मिश्रण आहे.. त्यातूनच त्या पीएम झाल्यातर मी मुंडन करून घेईल, दगडावर झोपेन अश्या प्रतिज्ञा घेतल्या जातात..
पक्षाध्यक्ष व यूपीए चेअरपर्सन असताना या इटालियन बहू ने आपल्या देशाला 2004 ते 14 असं दीर्घकालीन सरकार दिलं.. नेहरूनंतर प्रथमच 2 सलग टर्म्स काँग्रेसी प्रधानमंत्र्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. 91च्या रिफॉर्म्स ची पुढची पायरी गाठली.
“इंदिरा गरिबी हटाव म्हणायच्या तर गरिबी हटली का?” या कुत्सित प्रश्नाचं उत्तर काँग्रेस पक्षाने याच काळात दिलं.. तब्बल चाळीस कोटी लोक गरिबी रेषेच्या वर मध्यमवर्गात आले. जागतिक बँकेने त्याची स्तुती केली, वर्षातल्या 100 दिवस कामाची खात्री दिल्यानं गावपातळीवर होणारं गरीबांचं शोषण थांबलं.. अन्नसुरक्षा, नरेगा यातून गरीबांचं कल्याण झालं तर लँड कन्व्हेयन्स बिल, माहितीचा अधिकार, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट यातून शहरी नागरिकांचे प्रश्न सुटले… 1947 पासून पहिल्यांदाच आपण दोन आकडी विकासदर गाठला तेही सोनियाजींच्या नेतृत्वातच …
भारतीय जनतेच्या प्रत्येक घटकाची काळजी घेणारी ही भारतमाता आज वयाची 72 वर्षे पूर्ण करत आहे, नंदुरबारच्या आदिवासी बांधवांची ती आता “सोनिया माय” आहे तर पक्षातले रुसवे फुगवे घेऊन जाणाऱ्यांसाठी मॅडम सोनियाजी आहेत.. झारखंडच्या आदिवासींपासून ते दिल्लीच्या सिव्हिल सोसायटीपर्यंत “माय ते मॅडमजी” अश्या अनेक रुपात काँग्रेस पक्षाचा हा आधारस्तंभ मजबूत उभा आहे अन पक्षाला ताकद देण्याचे काम तो येणारी कित्येक वर्षे करत राहील यात शंका नाही…
– डॉ. अमर जाधव