खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला अग्रेसर बनविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळाला स्थान देणे आवश्यक आहे. सशक्त भारताच्या निर्माणासाठी आता यापुढे प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केली.
महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडियाच्या पुरस्कार वितरणप्रसंगी श्री. जावडेकर बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे, केंद्रीय क्रीडा सचिव राहुल भटनागर, स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) महासंचालक नीलम कपूर, अतिरिक्त मुख्य सचिव (क्रीडा) वंदना कृष्णा, स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) उपमहासंचालक संदीप प्रधान आदी उपस्थित होते.