अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने मुंबईतील काही तरुण मंडळी पाणी बचतीचे आवाहन नागरिकांना करत असते. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत ह्या चार तत्वांवर अंघोळीची गोळी संस्था उभारलेली आहे. पाणी बचतीचे आणि वृक्ष संवर्धनाचे ध्येय उराशी बाळगुन अंघोळीची गोळी संस्थेच्या टीम मुंबईतील ही तरुण मंडळी काम करत आहे. ह्याच अंघोळीची गोळीच्या टीमने नुकतेच दादर शहरांत झाडांवरील बॅनर, पोस्टर काढण्याचा उपक्रम पार पाडला. खिळेमुक्त झाडं संकल्पनेचा उदय पुण्यात झाला आणि त्यातून प्रेरित होऊन मुंबई टीम हा उपक्रम राबवत आहे. गेल्या वर्षभरापासुन हा उपक्रम मुंबईतील विविध भागात राबविला जात आहे. वृक्ष संवर्धन हेच ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर आहे त्यामुळे खिळेमुक्त झाडं हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा असे आवाहन खिळेमुक्त झाडं मोहिमेचे ठाणे जिल्हा समन्वयक अविनाश पाटील यांनी यावेळीं केले.
पुण्याच्या माधव पाटील या तरूणाने सुरु केलेली खिळेमुक्त झाडं मोहीम ठाणे आणि मुंबई परिसरात विस्तारण्यासाठी अंघोळीची गोळी टीम मुंबई प्रयत्न करत आहे आणि पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे. या मोहिमेत युवकांनी प्रामुख्याने झाडांना खिळेमुक्त, पोस्टरमुक्त, बॅनरमुक्त करण्याचा प्रयत्न केला. पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम आणि राष्ट्रीय ग्रीन ट्रिब्युनल यांत झाडांसंदर्भात अनेक कायदे आणि नियम स्पष्टपणे अधोरेखित असले तरी आपल्याकडे ते पाळले जात नाही त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील यांसाठी आमचा प्रयत्न चालु आहे असे खिळेमुक्त झाडं मोहिमेचे मुंबई जिल्हा समन्वयक तुषार वारंग यांनी यावेळीं सांगितले.
दादर शहरांत झालेल्या मोहिमेत २० पेक्षा अधिक युवकांनी सहभाग घेतला. उपक्रमात जय फाउंडेशन आणि ग्रीनमोम्स इंडीया संस्थेच्या सोनल मेनन, श्रेयस मेनन, प्रीती जांभळे, प्रांजल सिंगसाने, सीमा खोत, जय शृंगारपूरे, अंकिता गुडजी या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. वसुंधरा ग्रीन क्लब संस्थेच्या जयेश हरसोरा यांनी यावेळीं उपस्थित सर्वांना प्रत्येक झाडांची ओळख त्याचे महत्त्व सांगितले. अंघोळीची गोळी संस्थेचे कार्यकर्ते प्रणिल मिसळे, भुषण राजेशिर्के, राजन सिंग यांनी यावेळीं खिळेमुक्त झाडांची गरज उपस्थितांना समजावुन सांगितली.