पाण्याला तर जीवन संबोधलं जातं, म्हणूनच निरोग़ी आरोग्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम याचबरोबर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी हेच पाणी सकाळी अनशी पोटी व तांब्याच्या भांड्यात ठेवलेले प्यायल्यास त्याचा अधिक फायदा होतो. काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपारिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने घेतली. मग पहा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी का प्यावे ?
आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कफ, पित्त, वात) असते. त्यामुळे किमान 8 तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात सामाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत.
1) पचनसंस्थेला चालना मिळते
पित्त, अल्सर किंवा पोटात ग़ॅसचा विकार होणार्यांसाठी तांब्याच्या भांडात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत हितकारी आहे. तांब्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे, पोटातील जिवाणूंचा नाश होतो, जळजळ होण्याची समस्या कमी होते. तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ होतो, परिणामी पोट स्वच्छ राहण्यास मदत होते. पित्त दूर करण्यासाठी हे 8 पित्तशामक घरगुती उपाय नक्की करून पहा.
2) वजन कमी करण्यास मदत होते
फायबरनी परिपुर्ण भाज्या, फळं आणि वजन कमी करण्याचे इतर सगळे वापरून देखील तुमचे वजन कमी होत नाही ? मग तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नक्की पिऊन पहा. पचनसंस्थेला चालना देण्याबरोबरच हे पाणी शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यास मदत करते. शरीराला आवश्यक मेद शोषून घेतल्यानंतर चरबी वाढवणारे अनावश्यक मेद बाहेर टाकण्यास मदत करते. यामुळे तुमचे वजन काबूत राहण्यास नक्कीच मदत होते.
3) जखमा भरून काढण्यास मदत होते
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अॅन्टीबॅक्टेरीयल तसेच अॅन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत होते. तांब्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते, नवीन पेशींची निर्मीती होते. तांब्यामुळे शरीराच्या आतील जखमा विशेषतः पोटातील जखमा लवकर भरण्यास मदत होते.
4) सांधेदुखी दूर करते
तांब्यात दाह दूर करण्याची क्षमता असल्याने, संधीवाताच्या त्रासामुळे होणारी सांधेदुखी दुर होण्यास मदत होते. याचबरोबर हाडं मजबुतीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तांब्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने फायदा होतो.
5) थायरॉईडग्रंथींचे कार्य सुधारते
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहते. तांब्यातील खनिजं थायरॉईडग्रंथींचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात व थायरॉईड्च्या आजारापासुन आराम मिळतो.