सद्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूरूपी महामारी आपला पंजा भारतभरात घट्ट आवळत आहे आणि संपूर्ण भर सर्वशक्तीनिशी एकजुटीने त्याचा प्रतिकार करत आहे. जेव्हा जेव्हा अशी कुठली आपत्ती समाजावर आली आहे तेव्हा तेव्हा स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) आणि त्यांची सुपुत्री पूजनीय सौ. धनश्री तळवलकर (दीदी) यांनी नेहमीच सर्वांचीच चिंता केली आहे, काळजी केली आहे. सर्व व्यक्तींनी घराबाहेर पडू नये आणि social distancing कडक पाळावे ज्यामुळे या विषाणू संक्रमणावर काबू मिळवणे शक्य आहे. या अशा उपायांबरोबरच सद्यस्थितीत अनेक विदेशांत फॉगिंग मशिन्स द्वारे विशेष जंतुनाशकांची फवारणी करून अनेक हमरस्ते तसेच अनेक वस्त्यांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.स्वाध्याय परिवारातर्फे अशा प्रकारची विशेष ५ फॉगिंग मशिन्स महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाला आज दिनांक ११ एप्रिल रोजी भायखळा येथे अग्निशमन दलाच्या मुख्यालयात उपमुख्य अग्निशमन अधिकारी श्री. चौधरी व अग्निशमन दलाच्या इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली, ज्यांचा मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात निर्जंतुकीकरणासाठी वापर करण्यात येईल. अग्निशमन दलाच्या साहाय्यानेही मशिन्स उपयोगात आणली जातील. या फॉगिंग मशीनची विशेषता अशी आहे की हे मशीन एकावेळी ६०० लिटर पेक्षा जास्त प्रवाही द्रव्य साठवू शकते, सतत दीड तास फवारणी करू शकते तसेच जवळपास ३० चौरस मीटर इतके क्षेत्र एकावेळी कव्हर करू शकते. स्वाध्याय परिवाराने आरोग्य विभागाला दिलेली ही विशेष फॉगिंग मशिन्स जाहीर निर्जंतुकीकरणासाठी वरदानरूप ठरतील यात शंका नाही.स्वाध्याय परिवाराने वैद्यकीय क्षेत्रात जिवावर उदार होऊन सेवा बजावणाऱ्या अनेकांसाठी मास्क्स (masks) याआधीच आरोग्य विभागाला प्रदान केले होते. तसेच मुंबईप्रमाणे महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर व नांदेड येथे पण अशा प्रकारची फॉगिंग मशिन्स स्वाध्याय परिवाराकडून देण्यात येणार आहेत तर गुजराथ मधील अहमदाबाद, बडोदा, राजकोट, भावनगर, सुरेंद्रनगर, भुज या शहरात अशी अनेक मशिन्स यापूर्वीच दिली गेली आहेत. त्याबरोबरच मास्क, हँडग्लोव्हस तसेच सॅनिटायझर असे एकत्र असणारे ३० हजार किट्स आजपर्यंत स्वाध्याय परिवाराने दिलेले आहेत. स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम स्वाध्याय परिवारातर्फे होत आहे. अर्थात स्वाध्याय परिवारातर्फे दिली जाणारी कुठलीही वस्तू किंवा संयंत्र कोरोना संक्रमणासारख्या या विपरीत काळात केवळ सामाजिक भान व नैतिक कर्तव्य म्हणून समाजाला दिलेले एक छोटेसे योगदान आहे.