मुंबई : काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असं म्हटलं जात होते पण आज मराठी चित्रपट पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मराठी चित्रपटांचे यश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी चित्रपट आणि महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, आज मराठी चित्रपट गावागावात पोहोचणे आवश्यक असून यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन माध्यमाचा वापर करून अशा वेगळ्या पद्धतीचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले याचा आनंद होत आहे. तीन दिवस झालेल्या चर्चासत्रात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली आहे. मनोरंजन क्षेत्रासाठी सर्वसमावेशक धोरण ठरवताना या चर्चासत्रातील सूचनांचा विचार केला जाईल. चित्रपट, माध्यम व करमणूक धोरण आखण्यासाठी या विषयातील तज्ञांकडून ठोस सूचना मिळतील, असा विश्वास थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.
सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख म्हणाले,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कला क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी सांस्कृतिक कार्य विभाग या क्षेत्राला उभारी देण्यासाठी वेळोवेळी पुढाकार घेत आहे आणि यापुढेही घेत राहील.
दरम्यान, महाराष्ट्र हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान असून चित्रपट व करमणूक माध्यमांच्या क्षेत्रात कायमच अग्रेसर राहिले आहे. या अनुषंगाने प्रस्तावित चित्रपट, मनोरंजन व माध्यम धोरण असावे या मुख्य उद्देशातूनच तीन दिवस चालणाऱ्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आज संपन्न होणाऱ्या चर्चासत्रातून येणाऱ्या सूचनांच्या आधारे येणाऱ्या काळात या कला क्षेत्राला चांगला आकार देण्याचा प्रयत्न राहील.महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने या चर्चा सत्रातील सूचनांच्या आधारे धोरणाबाबतचा मसुदा तयार करावा. हा मसुदा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर मांडून, चर्चा करून त्यांच्या सूचनांसह या क्षेत्राला उभारी देऊ, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.